कुंभारआळीतील पणती व्यवसाय ठप्प, मातीच्या पणत्या ठरल्या ‘आऊट डेटेड’
महाड । दीपोत्सव उजळवणार्या पणत्यांचे अनेक प्रकार सध्या बाजारात आहेत. फॅन्सी पणत्याकडे ग्राहक आकर्षित होत असल्याने पारंपरिक असलेल्या मातीच्या पणत्यांची मागणी कमी झाली आहे. मागणी कमी झाल्याने महाडमधील कुंभारआळीतील पणत्यांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्पच झाला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून येथे पणत्या बनवण्याचे काम सुरू होते, मात्र या व्यवसायाने मान टाकल्याने कुंभारआळी ऐन दिवाळीत सुनी सुनी झाली आहे.
दिव्याचा सण म्हणून दीपावलीकडे पहिले जाते. गेले अनेक पिढ्या घराघरात दिवे लावून हा दीपोत्सव साजरा होतो. पारंपरिक पद्धतीने बनवलेले मातीचे दिवे याकरिता आणले जातात. मात्र सध्या राजस्थान, मध्यप्रदेश, बिहार या राज्यातून आलेल्या पणत्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करत आहेत. महाडप्रमाणेच पोलादपूर, श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव या तालुक्यांमध्ये कुंभार समाज पारंपारिक पद्धतीने मातीच्या पणत्या बनविण्याचा व्यवसाय करतात. महाडमधील कुंभार आळीमध्ये घरोघरी पणत्या विक्रीसाठी बनविल्या जात असत. कुंभार आळीतील तब्बल 30 कुटुंब अनेक वर्षांपासून हा व्यवसाय करतात. ज्या ठिकाणी 50 ते 60 हजार पणत्या तयार होत असत, तेथे आता पणती व्यवसायच ठप्प झाला आहे. मागील वर्षांपासून कुंभार आळीत एकही पणती बनविली गेली नाही. ज्या काही जुन्या पणत्या कारागिरांकडे शिल्लक आहेत त्या 30 रूपये प्रति डझनने विकल्या जात आहेत. तर फॅन्सी पणती प्रतिनग 10 ते 40 रूपये या दराने विकली जात आहे. असे असूनही ग्राहकांची पसंती फॅन्सी पणतीलाच असल्याने ग्राहकांप्रमाणेच दुकानदारांनीही स्थानिकांच्या पणत्यांकडे पाठ फिरवली आहे.
काय आहेत कारणे ः
* पणत्यांसाठी वापरण्यात येणारी माती विविध साच्यांमध्ये वापरता येत नसल्याने ग्राहकांना विविध प्रकारातील पणती देता येत नाही.
* वडिलोपार्जित व्यवसाय करण्यापेक्षा येथील तरुणांनी नोकरीला प्राधान्य दिल्याने हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे.
* बाजारात विविध प्रकारच्या फॅन्सी पणत्या उपलब्ध असल्याने मातीच्या पणत्यांकडे ग्राहकांनी आवर्जुन दुर्लक्ष केलेले दिसते.
Tags: matichya pantya, diva, lamp, diwali lamp, diwali festival, diwali diya,
Comments
Post a Comment